वाढदिवस दिनीही विकासकामांनाच प्राधान्य; पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा
वाढदिवस दिनीही विकासकामांनाच प्राधान्य; पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा
पंढरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामाजिक उपक्रम आणि विकासकामांच्या शुभारंभाने उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले दिलीप धोत्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तही वैयक्तिक सत्कारापेक्षा विकासकामांना प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दिलीप धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १७ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 17 मधील अरविंद कांबळे घर ते महात्मा फुले चौक रस्ता, शाळा नंबर सात समोर व्यायाम शाळा, रमाई नगर येथे भुयारी गटर, पाण्याच्या टाकी जवळ लक्ष्मी मंदिर या सर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते अनिल सावंत, नगराध्यक्ष प्रणिता भालके तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते नागेश भोसले यांच्या हस्ते या विकासकामांचा शुभारंभ झाला.
यावेळी माजी नगरसेवक नागेश यादव, किरणराज घाडगे, आदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक प्रसाद कळसे, नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत धोत्रे यांच्या समर्थकांनी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वयोवृद्ध नागरिकांना भोजनदानाचा उपक्रम राबविला. याशिवाय शहरातील विविध भागातही सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी दिवसभर दिलीप धोत्रे यांच्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी भेट देत त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विकासकामांचा शुभारंभ, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस यंदा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाजाभिमुख आणि विकासाभिमुख उपक्रमांनी साजरा झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.