विद्यार्थी व शिक्षकांनी आपला कणा ताठ ठेवावा - महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण
स्वेरीत ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा
विद्यार्थी व शिक्षकांनी आपला कणा ताठ ठेवावा - महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण
स्वेरीत ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूर - ‘माझ्या आईने मला योग्य वेळी योग्य दिशा दिली. वेळप्रसंगी तिने कान धरले. जर त्यावेळी तिने योग्य कडकपणा घेतला नसता तर आज मी आपल्या समोर उभा राहिलो नसतो, एवढी प्रगती झाली नसती. म्हणून आपली सर्वात प्रथम शिक्षक म्हणजे आई असते. साहित्य, नाटक, कलाकारी, पत्रकारीता आदी क्षेत्रात भूमिका निभावत असताना मला मनस्वी आनंद होतो. आपल्याला मनापासून जिथे आणि ज्यावेळी काम करण्याची संधी मिळते तेंव्हा अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अभिनय ही एक प्रकारची साधना असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिक्षण मिळत असते. म्हणून विद्यार्थी व शिक्षकांनी आपला कणा ताठ ठेवावा व आपले कार्य निरंतर करत रहावे’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये मध्यवर्ती असलेल्या भव्य खुल्या रंगमंचावर भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३८वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजिलेल्या ‘शिक्षक दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते, साहित्यिक, दिग्दर्शक, महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष, आखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास हे होते. महाराष्ट्र गीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ गीत, स्वेरी गीत व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले की, ‘विद्यार्थी दशेत असतानाच आपल्यामध्ये शिस्त व आदर रुजविणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रामाणिक परिश्रम करत आपल्या करिअरमध्ये यश मिळण्यापासून आपल्याला कोणीही रोखणार नाही. आज शिक्षकांचे महत्व हे वाढले असून ते विद्यार्थ्यांच्या यशावर अवलंबून आहे. म्हणून आज शिक्षकांपेक्षा विद्यार्थी हेच मोठे शिक्षक आहेत.’ शिक्षक दिनानिमित्त कांही विद्यार्थ्यांनी आपल्या विचारातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पुढे बोलताना प्रमुख पाहुणे योगेश सोमण म्हणाले की, ‘पुण्यात एकदा नाटक झाल्यानंतर माझ्या अंगात इगो भिनला होता. नाटक संपल्यानंतर बाहेर पडलो तर दिडशे नागरिक वाट पाहत रांगेत उभे होते. त्यांनी माझ्या पाया पडून माझ्यातील तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले कारण ते नागरीक माझ्या अभिनयातील संत तुकाराम पाहत होते. हे दृश्य पाहून माझ्यातील सर्व ‘इगो’ गळून पडला. तेथून मी खऱ्या अर्थाने यशाचा प्रवास सुरु केला. यातून आयुष्याला एक धडा मिळाला.’ असे सांगून त्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेच्या माध्यमातून गुरु- शिष्याचे स्पष्टीकरण दिले.
अध्यक्षीय भाषणातून साहित्यक डॉ. राजेंद्र दास म्हणाले की, ‘राज्यात सर्व ठिकाणी व्याख्याने दिली परंतु स्वेरीतील या ठिकाणचा परिसर, आदर, शिस्त आणि मिळालेला प्रतिसाद पाहता हा राज्यातील सर्वात मोठा ‘शिक्षक दिन’ आपण साजरा करतोय. आज समाजामध्ये शिक्षकांमुळे अनेकजण घडत आहेत. जर जीवनातून शिक्षक वगळले तर समाजाचे अस्तित्व शून्य आहे. आई, वडील, पालक, गुरु यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे करिअर उत्तम होते. म्हणून शिक्षित होणे अत्यंत गरजेचे आहे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी शिक्षक हजारो पावले झिजवतात.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. आंबेडकर यांसारख्या अनेक थोर माणसांचे स्मरण केले पाहिजे. ‘तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत’ ही भावना आपल्या मनात जागृत झाली पाहिजे आणि हेच खरे संस्कार शिक्षक देत असतात. असे सांगून ‘यशाच्या नशेत असताना अपयश कसे पेलावे’ ही स्वरचित कविता ‘सर’ या कवितेतून डॉ.दास यांनी स्पष्ट केले. यावेळी शिक्षकांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कल्याण शिंदे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, सचिव डॉ. सुरज रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त. बी.डी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी.नाडगौडा, सौ.कागदे, सौ.नाडगौडा, श्रीमती वंदना रोंगे,कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस.व्ही.मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ.बनकर,डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, परीक्षा नियंत्रक डॉ. सतीश लेंडवे, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.प्रणीता व्यवहारे, सेजल ठाकूर व डॉ.नीता तळवलकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.