राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर :- केरळ व तामिळनाडूचे राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर व त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने  मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते राज्यपाल राजेंद्र आर्लेकर  यांचा सपत्नीक शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी ,मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी मंदिर समितीचे सहा अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी  मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या  कामांची माहिती दिली.

चैतन्य दिनदर्शिकेचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशन

चैतन्य प्रतिष्ठान गोवा यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले या दिनदर्शिकेत तारखा, पक्ष, तिथी आणि सणांची विस्तृत व तपशीलवार माहिती देण्यात आली असल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.

यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे सदस्य शकुंतला नडगीरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे,प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले,पारंपारिक पद्धतीने व हिंदूच्या प्रथा परंपरेची माहिती मिळवण्यासाठी दिनदर्शिका महत्त्वाची आहे.कालगणना ही चैत्रापासून सुरू होते चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो हे नवीन वर्ष  सुरू होतं ते देशाच्या अनेक भागात सुरू होत असते. आपल्याला चैत्र महिना आठवत नाही आपल्याला जानेवारी माहीत असतो आपल्याला वैशाख माहीत नसतो पण आपल्याला फेब्रुवारी पूर्णपणे माहीत असतो ही आजची अवस्था आहे.

पारंपारिक पद्धतीने आपल्याला ही माहिती मिळणे गरजेचे आहे. कालगणना ज्यावेळी पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी पासूनही सुरू झाली म्हणून पृथ्वीचा उत्पत्ती दिवस  चैत्र प्रतिपदेला आहे‌  तो दिवस अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. चैत्र प्रतिपदा हीच पृथ्वीची उत्पत्ती दिवस आहे उत्पत्तीची  तिथी आहे आणि तेही शास्त्रोक्त आहे.कालगणना सर्व देशात पोचली पाहिजे. दिनदर्शिका ही दैनंदिन जीवनात उपयोगी असल्याचेही  राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.

तसेच मंदिर जतन व संवर्धनाचे काम चांगल्या पद्धतीने झाले असून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही दिवसात पुनर्वैभव  घेऊन उभा राहणार आहे असे सांगून अहंकाराचा वारा आम्हा सर्वांना लागू देऊ नको हीच विठ्ठला चरणी प्रार्थना केली असल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज म्हणाले चैतन्य दिनदर्शिकेत पारंपारिक पद्धतीने माहिती दिली असून यामध्ये तिथी, वार,चरण,करण,योग,नक्षत्र आदीबाबत माहिती देण्यात आली आहे. ही माहिती दैनंदिन जीवनात उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.