शिक्षकांच्या प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न करण्यात कोठेही कमी पडणार नाही - संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे
स्वेरीत सांगोला व मंगळवेढा तालुक्यासाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ संपन्न
शिक्षकांच्या प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न करण्यात कोठेही कमी पडणार नाही - संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे
स्वेरीत सांगोला व मंगळवेढा तालुक्यासाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ संपन्न
पंढरपूर - ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी, समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते. परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून असे प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाही गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य आणि खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एस.व्ही.आय.टी.) चे अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने सांगोला व मंगळवेढा तालुक्याकरिता स्वेरीत आयोजिलेल्या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्या’ प्रसंगी संस्थापक, अध्यक्ष आणि प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याविकास मंडळ, मंगळवेढाचे अध्यक्ष राहुल शहा हे होते. दीपप्रज्वलनानंतर बोलताना डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, ‘जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कन्फर्ट झोनच्या बाहेर जावून काम करावे लागेल.आजच्या शिक्षकांना खूप अडचणी आहेत, शिक्षक म्हणून मानसन्मान मिळतो आहे परंतु अशैक्षणिक कामाचा बोजा वाढलेला आहे, हे कमी करण्याची गरज आहे.’ असे सांगून टीईटी सह शिक्षकांचे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रलंबित प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. कार्यक्रमात जवळपास १५० जणांना आदर्श संस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक असे विविध पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंगळवेढ्यातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. मिनाक्षी कदम, शाहू शिक्षण संस्था, पंढरपूरचे सचिव अभिजीत ढोबळे, सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, लक्ष्मी शिक्षक प्रसारक मंडळ, मंगळवेढाचे संस्थापक अभियंता बजरंग दत्तू व राजुरी (ता. सांगोला) चे गुरुकुल विद्यालय व ज्यु. कॉलेजचे संस्थापक महादेव बाड यांच्यासह सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक आदी मिळून जवळपास तीन हजार जण उपस्थित होते.प्रा.यादव पनसवाड व प्रा. तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले.